मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिक यांना काही दिवसापूर्वी ईडीने कारवाई करत अटक केली आहे. या कारवाईनंतर भाजप नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंसाधन मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाच्या या मागणीला उत्तर दिला आहे. माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
जयंत पाटील म्हणाले कि नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप राजीनाम्याची मागणी करत आहे. खोटे-नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले की शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली, असे जयंत पाटील म्हणाले.
विरोधकांना चहा पाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही जयंत पाटील यांनी विरोधकांना केले आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक शरद पवार यांनी बोलवली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल तसेच या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.










