मुंबई – काही दिवसांपूर्वी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणी नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.
याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी ईडीने उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. त्यानुसार ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने ७ मार्च पर्यंत वेळ देऊन याचिका स्थगित केली आहे.
अटक करण्यामागे राजकीय हेतू असून ती बेकायदा ठरवण्याच्या मागणीसाठी मलिक यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष न्यायालयाच्या ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्याच्या आदेशालाही मलिक यांनी आव्हान दिले होते. याशिवाय ईडीने या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची, आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदा ठरवून आपली तातडीने सुटका करण्याची मागणी मलिक यांनी याचिकेद्वारे केली होती.
परंतु कोर्टाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत वेळ देत मलिकांची याचिका स्थगित केली आहे.











