जालना – सोन्याच्या दागिन्यांसाठी शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना बदनापूर तालुक्यातील साखरवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
रेखाबाई बाबूराव कोलपे (५०, रा. पानशेंद्रा, ता. जालना) व भगवान विजयकुमार पाटील (३१, रा. मोदीखाना, जालना) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पानशेंद्रा येथील सुमनबाई माणिक जिगे (६५) यांचा ११ मार्च रोजी बदनापूर तालुक्यातील साखरवाडी परिसरात मृतदेह आढळून आला होता. याचा तपास करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, ८ मार्च रोजी सुमनबाई जिगे या गावातीलच रेखाबाई कोलपे यांच्यासोबत गेल्या होत्या.
यावरून पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मयत महिलेने हात उसने घेतलेले पैसे परत केले नसल्याने. तिच्याबाबत मनात राग होता. शिवाय, तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने चोरुन घेण्यासाठी हा खुनाचा प्लॅन आखल्याची कबुली दिली.