मुंबई – अहमदनगर येथील राहणारे पाच भाविक कर्नाटकामधील गाणगापूर येथून देवदर्शन करून अक्कलकोटच्या दिशेने परत येताना त्यांच्या काराचा भीषण अपघात झाल्याने चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या भीषण अपघातामध्ये अन्य तीन मुले गंभीर जखमी झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अफझलपूर तालुक्यात बळुर्गीजवळ हा भीषण अपघात झाला.
अहमदनगर येथील काही भाविक कुटुंबीयांसह अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन करून, पुढे श्री दत्तात्रेयाचे स्थान असलेल्या गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथील देवदर्शन आटोपून समाधानी ते अक्कलकोटच्या दिशेने परत निघाले होते. तेव्हा वाटेत बळुर्गी गावाजवळ त्यांच्या कारचे (एमएच १६ बीएच ५३९२) टायर फुटले आणि चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात कारमधील चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
तर, गंभीर जखमी झालेल्या तीन मुलांना कलबुर्गी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृत व जखमींची नावे सायंकाळी उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. अफझलपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.