केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मंडळातील आपल्या मंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुंबई | शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्री मंडळातील आपल्या मंत्रिपदाचा काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी राजीनामा दिला होता. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा मंत्रिमंडळातून राजीनामा स्वीकारला आहे. हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योगाचं केंद्रीय मंत्रिपद होतं. त्यांनी राजीनाम दिल्याने या पदाची जबाबदारी मंत्रिमंंडळातील मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
कृषीविषयक विधेयके पंजाबमधील कृषी क्षेत्र नष्ट करतील, असा दावा करत सुखबीर यांनी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत या राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर हरसिमरत यांनी मोदींना चार पानी राजीनामा पत्र पाठवत केंद्र सरकारला लक्ष्य केलं होतं. काल त्यांनी यासंदर्भात ट्विट करत आपल्या राजीनाम्याबद्दल माहिती दिली होती.
दरम्यान, मी शेतकरी विरोधी विधेयक आणि कायद्यांचा विरोध करत केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. शेतकऱ्याची मुलगी आणि बहिण म्हणून त्यांच्यासोबत उभी राहिल्याचा मला अभिमान आहे, असं हरसिमरत कौर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.