एमआयएम आक्रमक, तबलिघींची बदनामी, माफी मागा ः डॉ. अशरफी
नगर ः न्यायालयाने तबलिघी जमात मरकझप्रकरणी दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचा आदेश दिला. याबरोबर कोरोना काळात जमातीला बळीचा बकरा बनविले, असेही निरीक्षण नोंदविले. आता याचाच आधार घेत एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी चांगलेच आक्रमक झाले आहे. अहमदनगर महापालिकेने तबलिघी जमातीची ध्वनिक्षेपक लावून जी बदनामी केली, त्याची बिनशर्त माफी मागावी. महापालिकेच्या लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे तबलिघीची जी बदनामी केली त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात डॉ. अशरफी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहेत.
अहमदनगर महानगपालिकेने दिल्ली मरकझ, तबलिघी जमात, हजरत निजामुद्दीन यांच्या विरोधात ध्वनिक्षेपक लाऊन पूर्ण महापालिका क्षेत्रात असे वातावरण निर्माण केले की जसे करोना या देशात त्यांच्यामुळेच आला. आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला की यांना बळीचा बकरा करण्यात आला आहे. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेने पुन्हा ध्वनिक्षेपक लावून तबलिघी जमात व मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागावी, ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे हा अपप्रचार केला गेला, त्यांनाही द्वेष पसरविल्याबद्दल दोषी धरून कारवाई करावी, अशी मागणी अशरफी यांनी केली आहे.