
नगर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-२० (T20) चे सामने सध्या सुरु झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना भारताने जिंकल्यानंतर दुसरा टी-२० सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. या सामन्यातही भारताने ऑस्ट्रेलियाला चितपट केले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण देण्यात आले. मात्र भारताने टी-२० फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारत विजय मिळविला. या सामन्यात यशस्वी जैस्वालने मात्र दमदार कामगिरी केली आहे.
भारताने सुरवातीला फलंदाजी करत २० षटकात ४ गडी गमावून २३५ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाला केवळ १९१ धावा करता आल्यात. त्यामुळे त्यांनी हा सामना ४४ धावांनी गमावला. या सामन्यात यशस्वी जैस्वालला सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. यशस्वीने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीपासूनच सामन्यातून पराभूत केले होते. त्याने केवळ २५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावांची उत्तम खेळी केली. याशिवाय क्षेत्ररक्षणातही त्याने दोन झेल घेतले.
यशस्वी जैस्वालने प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावल्यानंतर पहिल्या टी-२० सामन्यात झालेली चूक मान्य केली. आणि त्या चुकीसाठी रुतुराज गायकवाडची माफी देखील मागितली.यशस्वीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी- २० सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. पॉवरप्लेमध्ये टी- २० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी अर्धशतक झळकावणारा जयस्वाल हा तिसरा खेळाडू ठरला. यशस्वी खेळी करत भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा विजय खेचून आणला.