
श्रीगोंदा : तालुक्यातील लिंपणगाव येथील ग्रामस्थ व महिलांनी विविध मागण्यासाठी श्रीगोंदा (Shrigonda) तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती जगताप (Pranoti Jagtap) आणि सुवर्णरत्न पतसंस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा पाचपुते (Suvarna Pachapute) यांनी तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आंदोलक आणि अधिकारी यांच्याशी चर्चा घडवून आणल्याने उपोषणकर्त्या महिलांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले.
संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावीत, रेशन कार्ड न मिळणे, बेघर कुटुंबांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, महिलांचा आदर सन्मान न करता जाणून-बुजून महिला ग्रामसभा रद्द करणे, ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये उपस्थित न राहता ग्रामसेवक कर्तव्यात कसूर करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने लिंपणगाव येथील ग्रामस्थ व महिलांनी उपोषण सुरू केले होते.
डॉ. प्रणोती जगताप व सुवर्णा पाचपुते यांनी उपोषणस्थळी भेट देत महिलांच्या मागण्या समजून घेतल्या व तहसीलदार मिलिंद कुलथे, गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्यासह अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत मागण्या मार्गी लागण्याचे लेखी आश्वासन मिळवून दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. बीआरसचे नेते टिळक भोस, अनिल ठवाळ, उपनगराध्यक्ष राजू गोरे, संदीप उमप, किरण कुरुमकर, अरविंद कुरुमकर, निलेश कुरुमकर, लता सावंत, पल्लवी शेलार, उज्वला मदने, सुनीता बनकर, रोहिणी राऊत, सारिका गोंडे यांच्यासह अनेक महिला आणि लिंपणगाव ग्रामस्थ उपस्थित होते.


