
Shri Ram Temple : संगमनेर : अयोध्येमध्ये (Ayodhya) उभे राहत असलेले प्रभू श्रीरामांचे मंदिर (Shri Ram Temple) हिंदू अस्मितेचा स्त्रोत बनणार आहे. या एैतिहासिक क्षणाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी गावोगावी आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर स्वच्छतेच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, मंत्री विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांसह संगमनेर बसस्थानकाजवळील दत्त मंदिरात स्वच्छता अभियान राबविले. स्वच्छता कामगारांशीही त्यांनी संवाद साधून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कारसेवेत सहभागी झालेले उत्तमराव कर्पे यांचा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
लाखो हिंदूचे स्वप्न पुर्ण (Shri Ram Temple)
मंत्री विखे पाटील म्हणाले, अयोध्येमध्ये भक्तीमय वातावरणात असलेला मंदिर लोकार्पण सोहळा हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. संपूर्ण भारत देश आता राममय झाला असून, रामलल्लाच्या स्वागतासाठी देश सज्ज झाला आहे. या एैतिहासिक क्षणामुळे लाखो हिंदूचे स्वप्न पुर्ण होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील आणि भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण पर्व ठरणार आहे. एकीकडे देश आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली विश्वगुरु बनण्याच्या संकल्पावर यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. जगातील तिसरी मजबुत अर्थव्यवस्था म्हणून भारत देशाची ओळख आता जगामध्ये निर्माण होत आहे. याच एैतिहासिक पर्वामध्ये श्रीराम मंदिराचे होत असलेले लोकार्पण ही देशवासियांच्या दृष्टीने मोठी एैतिहासिक घटना घडत आहे. या आनंदामध्ये सर्वांनीच सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडणार (Shri Ram Temple)
संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शहरातील मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या निधीस तत्वता मान्यता दिल्याचे सांगून अयोध्येतील कार्यक्रमाच्या क्षणाचे औचित्य साधून निळवंडे धरणांच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. मंत्री विखे पाटील यांनी शहरातील पंजाबी कॉलनीतील मंदिरात जावून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यासही अभिवादन केले.