
Sangram Jagtap : नगर : शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राचे धडे देणे गरजेचे आहे. यासाठी क्रीडा स्पर्धेचे (sports competition) आयोजन होणे गरजेचे आहे. या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो. आंजनेय प्रतिष्ठानच्या माध्यमातून १४ व १९ वर्षीय खेळाडूंसाठी बाळासाहेब पवार स्मृती करंडक स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे (Cricket tournament) आयोजन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.
अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, सुमतीलाल कोठारी, गणेश गोंडाळ,गौरव पितळे, ज्ञानेश चव्हाण, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंपनीचे जनरल मॅनेजर गौतम सुवर्णपाठकी, प्रदीप आरोटे, कपिल पवार, निखिल पवार, सोमनाथ नजान, भरत पवार, डॉ. राहुल पवार, संदीप पवार, दिलीप पवार, भास्कर गायकवाड, श्रीकांत निंबाळकर आदींसह खेळाडू उपस्थित होते.
कपिल पवार म्हणाले की, क्रिकेट खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, खेळाडूंच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी आंजनेय प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडिलांच्या स्मरणार्थ गेल्या ७ वर्षांपासून लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. पुढील वर्षी पासून जर मुलींचे चार संघ तयार झाले तर त्यांच्या देखील स्पर्धा आयोजित केल्या जातील. सर्वांच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात २७ संघ सहभागी झाले आहे. या स्पर्धेतून अनेक खेळाडू तयार झाले आहे. पुढील मोठ्या स्पर्धेसाठी खेळत आहे हे कौतुकास्पद असून आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळासाठी प्रोत्साहन मिळत असते, असे त्यांनी सांगितले.