
Radhakrishna Vikhe Patil : नगर : गारपीट आणि अवकाळी पावसाने (Unseasonal rain) नुकसान झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहे. तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका, चारा उत्पादनासाठी नियोजन करा, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मदत करण्यात शासन (Government) कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने दिली.
मंत्री विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथील एकनाथ खोदडे यांच्या नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहाणी केली. गारपीटीने नुकसान झालेल्या महादू बापूराव आढाव यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेची पाहाणी करुन माहिती घेतली. झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. प्रामुख्याने जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. चाऱ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याकडून चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे.




