
नगर : नगरसह राज्यातील ४८० तीर्थक्षेत्रांचा (pilgrimages) कायापालट करण्यासाठी ग्रामविकास विभाग सरसावला आहे. या याेजनेसाठी ‘ब’ दर्जाच्या तीर्थस्थळांची निवड करण्यात आली असून यासाठी २४०० कोटी रुपयांची योजना ग्रामविकास विभाग (Rural Development Department) मार्फत राबवली जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.
या याेजनेंतर्गत प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी पाच काेटी रुपये देण्यात येणार आहे. या याेजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येक तीर्थस्थळांना देण्यात येणाऱ्या निधीतून तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, निवारे, स्वच्छता साठीच्या उपाययोजना, भक्तांना बसण्यासाठीच्या जागा तयार करणे आदींचा समावेश असणार आहे.
यापूर्वी तीर्थक्षेत्रांना दाेन काेटी रुपयांचा निधी देण्यात येत हाेता. त्यात आता अडीच पट वाढ केली जाणार आहे. अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली आहे. या याेजनेत नगर जिल्ह्यातील श्री शनेश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर, संत ज्ञानेश्वर देवस्थान, श्री निळोबाराय संजीवनी समाधी मंदिर, श्री कानिफनाथ मंदिर, कोतुळेश्वर महादेव मंदिर, अगस्ती ऋषी देवस्थान आदी तीर्थस्थळांचा समावेश आहे.