
नगर : निळवंडे कालव्याच्या (Nilwande Dam) अस्तरीकरणाच्या कामासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या पाठपुराव्यामुळे या निधीस प्रशासकीय (administrative) मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांना शाश्वत पाणी पुरवठा हाेण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
निळवंडे धरणातील ८ टीएमसीमधील ६.५० टीएमसी पाण्याच्या साठ्यातून सुमारे ६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, एवढे मोठे क्षेत्र पारंपरीक पद्धतीने भिजविणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे कालव्यांचे अस्तरीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनस्तरावर करण्यात आला.
निधीची तरतूदही झाल्याने खुल्या कालव्यांचे अस्तरीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अस्तरीकरणाचे काम वेळेत पूर्ण हाेण्यासाठी पाच स्वतंत्र निविदा प्रसिद्ध झाल्या आहे. निळवंडे प्रकल्पाच्या कोणत्याही कामास निधीची अडचण भासणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी दिली आहे.



