गडचिरोली : गडचिरोली नक्षलविरोधी पोलीस पथकाने चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेला ठार केल्याची अधिकृत माहिती गडचिरोली पोलिसांनी दिलीये. चकमकीत नगरचा मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली.
मिलिंद तेलतुंबडे माओवादी संघटनेच्या केंद्रीय सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य होता. महाराष्ट्र, छत्तीसगढ, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओदिशा इत्यादी 6 राज्यात तो सक्रिय नक्षलवादी होता. त्याच्यावर तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे बक्षीस होते.
मिलिंद तेलतुंबडे कोण?
माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेची देशभरातील नक्षलवादी कारवायांमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास या नावाने ओळख असलेला हा माओवादी नेता गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत ठार झाला आहे. समाजाच्या काही घटकांमध्ये हिंसक विचारसरणी पेरुन नक्षल भरती करण्यात त्याचा मोठा हात होता. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेचा मृत्यू झाल्याने नक्षलवाद्यांसाठी हा मोठा झटका असणार आहे.
मिलिंद तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता उर्फ कविता ही बीएस्सी (मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी (झुऑलॉजी), एम्ए (सोशॉलॉजी) आणि बीएड अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.
26 नक्षलवादी ठार
13 नोव्हेंबरला सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.
लोकांच्या घटलेल्या पाठिंब्यामुळे चिंतेत असलेल्या नक्षलवाद्यांनी 2014 मध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल केले होते. त्यावेळी महाराष्ट्राची जबाबदार सांभाळणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेला नक्षलवाद्यांमध्ये सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रीय समितीत पहिल्यांदाच दलित समाजाला प्रतिनिधित्व देऊन नक्षलवाद्यांच्या भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले होते. महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम पाहणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेवर उत्तर गडचिरोली, गोंदिया आणि बालाघाट या विभागाची जबाबदारी होती.