
नगर : महावितरण (Mahavitaran) प्रशासनाकडून राज्यभर प्रीपेड वीज मीटर बसविले जाणार आहेत. मोबाइल, डिश, टीव्हीप्रमाणे रिचार्ज (Recharge) करा आणि वीज वापरा या संकल्पनेवर हे मीटर काम करेल. लवकरच हे स्मार्ट मीटर (Smart meter) टप्याटप्प्याने कार्यरत होणार आहेत.
राज्यातील महावितरणच्या दाेन कोटी ४१ लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलून त्या ऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीज ग्राहक मोबाईलप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईलवर मिळणार आहे. ग्राहकांना नवे प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहे. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.
ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले, तर अचानक रात्री वीजपुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले, तरी वीजपुरवठा सुरू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीजपुरवठा सुरू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील, अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे. प्रीपेड मीटरमध्ये १०० रुपये त्यापुढे कितीही रुपयांपर्यंत रिचार्ज करता येणार आहे.