
Jitendra Awhad: नगर : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप (BJP) आक्रमक झाली असून आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांनी जितेंद्र आव्हाडांना अटक करा, (Arrested) अशी मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध म्हणून आमदार कदम याबाबत तक्रार दाखल करणार आहेत. तसेच,आव्हाडांचा निषेध म्हणून घाटकोपरमध्ये मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे.येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामांचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
श्रीराम मांसाहारी होते याचा पुरावा आव्हाडांनी द्यावा, पुरावा नसेल तर आव्हाडांनी देशाची, राम भक्तांची माफी मागावी, भव्यदिव्य राममंदिर बनतंय यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय, असं राम कदम म्हणाले आहेत. तसेच, जितेंद्र आव्हाडांना अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे.
काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड ?
राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी १४ वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेआमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.
यावेळी ओबीसींच्या मुद्यावरून आव्हाड यांनी भाजपवर देखील टीका केली.तसेच महात्मा गांधी यांचं नेतृत्व यांना फार अगोदरपासून मान्य नव्हतं असा आरोपही आव्हाड यांनी केला. त्यांच्यावर १९४७ साली हल्ला झाला नव्हता, त्यांच्यावर १९३५ आणि १९३७ या वर्षातही हल्ला झाला होता. कारण काय तर गांधी हे बानिया होते म्हणजे ओबीसी होते आणि ओबीसीच नेतृत्व हे त्यावेळीस सुद्धा मान्य नव्हते असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.