
नगर : वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व भारताच्या (India) भेदक गोलंदाजी समोर श्रीलंकेचा क्रिकेट संघ अवघ्या १५.२ षटकांत गारद झाला. श्रीलंकेने भारता समोर विजयासाठी ५१ धावांचे तुटपुजे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारताने अवघ्या ६.१ षटकांत एकही गडी न गमावता साध्य करत आशिया कप (asia cup) पटकाविला. भारतीय संघाने हा सामना १० गडी राखून जिंकला. भारतीय संघाने सात वेळा आशिया कप जिंकला आहे.
श्रीलंका व भारत यांच्यात आज आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झाला. यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारतीय वेगवान गोलंदाजांनी चुकीचा ठरविला. मोहम्मद सिराजने सात षटकांत २१ धावा देत सहा फलंदाज बाद केले तर जसप्रित बुमराहने एक तर हार्दिक पांड्याने तीन फलंदाज बाद केले. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावा जमवू शकला. श्रीलंकेकडून सर्वाधिक १७ धावा कुशल मेंडिसने जमविल्या.
विजयासाठी ५१ धावांचे तुटपुजे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीविरांनी एकही गडी न गमावता अवघ्या ३७ चेंडूत विजयश्री खेचून आणली. इशान किशनने २३ तर शुभमन गिलने २७ धावा केल्या. मोहम्मद सिराज सामनावीर ठरला तर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला मालिकाविराचा बहुमान देण्यात आला.