
नगर : भारत ( India ) व पाकिस्तानच्या ( Pakistan ) क्रिकेट संघात काल (सोमवारी) आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामना झाला. या सामन्यात तडाखेबाज फलंदाज विराट कोहली (१२२ धावा) व जिगरबाज के. एल. राहुल (१११ धावा) यांनी झळकावलेली नाबाद शतके व कुलदीप यादवची भेदक गोलंदाजी समोर पाकिस्तानच्या संघाने सपशेल शरणांगती पत्करली. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा तब्बल २२८ धावांनी पराभव केला.
या विजयामुळे भारतीय संघाच्या रँकिंगमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. भारताचा आज श्रीलंकेविरुद्ध सामना होणार आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत धावांचा डोंगर रचला. भारताच्या सलामीविरांनी संघाला चांगली सुरुवात दिली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. भारतीय संघाचा धावफलक १२१ वर असताना रोहित शर्मा शादाब खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पाठोपाठ गिलनेही आपली विकेट टाकली. त्यानंतर मात्र, विराट कोहली व के. एल. राहुल यांनी जबाबदारीने खेळत संघाला मोठी धाव संख्या उभी करून दिली. भारतीय संघाने ५० षटकांत अवघे दोन गडी गमावत २५६ धावा केल्या.
पाकिस्तानसमोर ३५७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने इमाम उल हकला ९ धावांवर बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्याने कर्णधार बाबर आझमचा ११ धावांवर त्रिफळा उडवत पाकिस्तानला दुसरा आणि मोठा धक्का दिला. या धक्क्यांतून पाकिस्तानचा संघ सावरला नाही. कुलदीपने २५ धावा देत पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखविला. पाकिस्तानचा डाव ८ गड्यांच्या मोबदल्यात १२८ धावांत आवरला.



