
IND W vs ENG : नगर : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women’s Cricket Team) मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) इंग्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना (Test Match) ३४७ धावांनी जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारताने कसोटीत पहिल्यांदाच इंग्लंडला मायदेशात घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. दीप्ती शर्माच्या (Deepti Sharma) अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडवर मोठा विजय नोंदवला.
भारतीय महिला संघाचा इंग्लंडविरुद्धचा हा एकूण तिसरा विजय आहे. यापूर्वी त्याने २००६ मध्ये टॉंटन आणि २०१४ मध्ये वर्म्सले येथे विजय मिळवला होता. त्याचवेळी महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या बाबतीत टीम इंडियाने सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात ४२८ धावा केल्या होत्या. नवोदित शुभा साथिसने ६९ धावांची खेळी खेळली तर दीप्ती शर्माने ६७ धावांचे योगदान दिले. विकेटकीपर यास्तिका भाटिया ६६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ४९धावांचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्ज ९९ चेंडूत ६७ धावा करून बाद झाली.
प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात १३६ धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने पहिल्या डावात ५ बळी घेतले. टीम इंडियाने आपला दुसरा डाव ६ गडी बाद १८६ धावांवर घोषित केला. पहिल्या डावात भारताकडे २९२ धावांची आघाडी होती. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी ४७९ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात १३१ धावांत गारद झाला. भारताकडून दीप्ती शर्माने चार आणि पूजा वस्त्राकरने तीन बळी घेतले. राजेश्वरी गायकवाडने दोन तर रेणुका सिंह ठाकूरने एक विकेट घेतली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघाने या विजयासह मोठा विश्वविक्रम केला.