
उद्या (ता. २२) विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा सामना न्यूझीलँडशी (Ind Vs Nz) होत आहे. या सामन्यातून भारताला २०१९ मधील विश्वचषकातील पराभवाचा बदला घेऊन हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. २०१९ मधील न्यूझीलँडविरुध्द पराभव झाल्याने भारत विश्वचषकातून (World Cup) बाहेर पडला होता. या सामन्यात विजयासाठी केवळ १८ धावा बाकी असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) धावबाद झाल्याने संपूर्ण देश हळहळला होता. आता १८ नंबरची जर्सी परिधान करणारा विराट कोहली (Virat Kohli) प्रचंड फाॅममध्ये असल्याने २०१९ च्या पराभवाची परतफेड करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.

वर्ल्ड कप २०१९ च्या विश्वचषक इंग्लंडमध्ये पार पडला. यामध्ये भारत विरुद्ध न्यूझीलँड या दोन्ही संघ जबरदस्त फाॅममध्ये होते. भारत- न्यूझीलँड सामन्यात न्यूझीलँडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २३९ धावा करुन भारतापुढे २४० धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने फलंदाजी करताना सुरुवात खराब झाली. संपूर्ण विश्वचषकात जबरदस्त फाॅर्ममध्ये असणारा रोहित शर्मा फक्त एक धाव करून बाद झाला. बाकीचेही फलंदाजही लवकर बाद झाले. भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे जडेजा व एम एस धोनीने. त्यांनी अनुक्रमे ७७ आणि ५० धावा केल्या. जिंकण्यासाठी केवळ १८ धावा शिल्लक असताना धोनी धावबाद झाला. त्यामुळे भारत हा सेमीफायनलचा सामना हरला आणि विश्वचषकातून बाहेर पडला. सर्व खेळाडू फाॅममध्ये होते. भारत सर्व सामने जिंकत होता.
मात्र, या एका पराभवामुळे २०१९ च्या विश्वचषक जिंकण्याचा स्वप्नावर पाणी फिरले. २००३ पासून वनडे विश्वचषकात भारत न्यूझीलँडविरुद्ध जिंकलेला नाही. सध्याचा विचार करता २०२३ च्या विश्वचषकात गुणतालिकेमध्ये न्यूझीलँड व भारत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. दोघांनीही चार चार सामने जिंकलेले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा २०१९ च्या विश्वचषकात जबरदस्त फाॅममध्ये होता. त्याने पाच शतकी ठोकली होती. यावर्षीही रोहित शर्मा आक्रमकपणे खेळत आहे. भारताने या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश यांना हरवले आहे. न्यूझीलँडविरुद्धचा सामना जिंकून २०१९ च्या पराभवाचा बदला घेत उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करण्याची संधी भारताला आहे.