
GST : नगर : सध्या शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सर्वाधिक अडचणीत आला आहे. कधी नैसर्गिक आपत्तींचे संकट, तर कधी पिकाला मिळणारा मातीमाेल भाव, यामुळे शेतकरी (Farmer) जेरीस आला आहे. दुसरीकडे निविष्ठांवरील जीएसटी (GST) पासून ते शेतीमालाच्या निर्यातीपर्यंत शेतकऱ्यांना मातीत घालणाऱ्या धोरणांचा अवलंब खासकरून केंद्र सरकार (Central Govt) कडून केला जात आहे. कृषी निविष्ठांचे दर मुळातच अधिक आहेत. ज्यात बियाणे वगळता रासायनिक खते, कीडनाशकांवर जीएसटी आकारला जात आहे. त्याचेही दर अजूनही वाढत आहे.
जीएसटीतून शेती क्षेत्रही सुटलेले नाही. कधी हळद शेतीमाल नाही म्हणून, तर कधी शेतकऱ्यांच्या पातळीवर प्रक्रिया होणाऱ्या पदार्थांना जीएसटीच्या कचाट्यात घेतले जाते. युरिया, डीएपी या मुख्य अन्नद्रव्यांना पाच टक्के, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांना १२ टक्के, तर कीडनाशकांवर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. खते, कीडनाशके उत्पादक कंपन्या डीलर्स-डिस्ट्रिब्युटर्सला जीएसटी लावतात, तर डीलर्स-डिस्ट्रिब्युटर्स कृषी सेवा केंद्रचालकांना जीएसटी लावतात. कृषी सेवा केंद्र चालक हाच जीएसटी शेवटी शेतकऱ्यांकडून वसूल करतात. त्यामुळे जीएसटी परिषदेच्या आगामी बैठकीत खते, कीडनाशकांवरील जीएसटी हटविण्याबाबत निर्णय घ्यायला हवा. याशिवाय थेट शेतकऱ्यांना इतर कोणत्या जीएसटीचा भुर्दंड बसतो, याचाही आढावा घेतला पाहिजे