
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी सुरू झालेलं आंदोलन अखेर बुधवारी हिंसक वळणावर गेलं. या भीषण चकमकीत चार जणांचा बळी गेला असून किमान ४५ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे जखमींमध्ये तब्बल २२ पोलिसांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात गंभीर आणि धक्कादायक घटना ठरली आहे.
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली १५ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
मागण्या मान्य होत नसल्याने बुधवारी बंदची हाक देण्यात आली आणि त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिस आणि अर्धसैनिक दलाने लाठीचार्ज, अश्रुधूर आणि अगदी गोळीबाराचाही मार्ग अवलंबला.
दरम्यान, लडाख अॅपेक्स बॉडीच्या युवक शाखेच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला होता. उपोषणाला तब्बल ३५ दिवस झाले असून मंगळवारी दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने संतापाची ठिणगी पडली आणि आंदोलन पेटलं.
लडाखच्या जनतेचा असंतोष आता धगधगत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.