
Death : संगमनेर : परण्या निघालेल्या नवरदेवाला वाटे लावण्यासाठी आलेल्या मित्रमंडळी व नातेवाईकांच्या ध्यानीमनी नसताना डीजे (DJ) च्या वाहनाच्या रूपाने धावून आलेल्या काळात (Accident) एका 35 वर्षाच्या युवकाचा जागेवर बळी घेतला (Death) तर उपचार सुरु असताना एका ६५ वर्षीय वृध्दाची प्राणज्योत मालवली. ही घटना गुरुवारी (ता.४) सायंकाळी चारच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे घडली.
धांदरफळ खुर्द येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे शुक्रवारी (ता.५) तालुक्याच्या पठार भागातील रणखांब येथे लग्न आहे. लग्नासाठी नवरदेवाची परंपरेप्रमाणे गावातून वरातीने वाजत गाजत पाठवणी सुरु होती. त्यासाठी आलेल्या डीजे समोर मित्रमंडळी, नातेवाईक व भाऊबंद नाचून आनंद व्यक्त करीत होते. मात्र त्यांचे हे सुख नियतीला मंजूर नव्हते. दरम्यान वाहन चालकांमध्ये अदली बदली झाली. नव्याने चालक म्हणून बसलेल्या व्यक्तीचा पाय उताराला असलेल्या वाहनाच्या ब्रेक ऐवजी क्लचवर पडल्याने नियंत्रण सुटलेले वाहन थेट समोरच्या जमावात घुसले. क्षणार्धात झालेल्या या घटनेत बाळासाहेब हरीभाऊ खताळ (वय ३५) याच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या वाहनाने चिरडल्याने भास्कर राघू खताळ (वय ६५) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तसेच या दुर्दैवी घटनेत अभिजित ठोंबरे, रामनाथ दशरथ काळे, गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान रावबा खताळ, भारत भागा खताळ व सागर शंकर खताळ, अभिजीत संतोष ठोबरे व अलका खताळ हे सहाजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे घटनास्थळी दाखल झाले.




