
श्रीरामपूर : सायबर क्राईम (Cybercrime), सोशल क्राईम आणि रॅगिंग (Raging) समाजाला लागलेला कलंक आहे, तो नष्ट केला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीरामपूर शहर पोलीस (Police) ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी केले. बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (National Service Scheme) विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, ग्रीव्हन्स सेल आणि जेटीएस शिक्षण संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
बोरसे म्हणाले, आजही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात रॅगिंग होत आहे. रॅगिंगसाठीची मानसिकता असणे तशी सामूहिक व्यवस्था निर्माण केली जात आहे. समाजातील प्रत्येक घटकाने सायबर क्राईम, सोशल क्राईम आणि रॅगिंग याविषयी चिंतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेट वरील क्राईमपासून दूर राहिले पाहिजे, व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे. उत्तम करिअर केले पाहिजे. स्वतःवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी 1999 मध्ये रॅगिंग प्रतिबंधात्मक कायदा झाल्याचे सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्टॅट्युटनुसार प्रत्येक विद्यार्थ्याकडून तो फॉर्म भरुन घेतला जातो. उपप्राचार्य प्रा. सुनिता ग्रोव्हर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त बापुसाहेब पुजारी, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, विश्वस्त शेखर डावरे, रविंद्र खटोड, मुख्याध्यापक डी.डी.पुजारी, शिक्षक प्रतिनिधी प्रा.नामदेव मोरगे आदी उपस्थित होते. चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब पवार यांनी केले. प्रा. रुपाली उंडे यांनी सुत्रसंचालन केले. तर प्रा. प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. रुपाली उंडे, ग्रीव्हन्स सेलचे डॉ. व्ही.एन.काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.सदर चर्चासत्रासाठी ज्युनिअर व सिनियर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



