Crop Insurance : श्रीरामपूर तहसील कार्यालयास शेतकऱ्यांचा घेराव

    154

    Crop Insurance : श्रीरामपूर : तालुक्यातील अग्रीम पीक विम्याची (Crop Insurance) २५ टक्के रक्कम तसेच अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शनिवारपर्यंत भरपाई देण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांसह ११ डिसेंबर २०२३ नंतर तहसील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे (Congress) तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक व माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी दिला. शेतकऱ्यांना चार दिवसात नुकसान भरपाईची (Compensation) रक्कम अदा होईल, यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे तहसीलदार मिलिंद वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले. अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसानग्रस्त मंडळातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई अनुदान देण्यात यावे, अग्रीम पीक विम्याची २५ % रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी आमदार लहू कानडे (MLA Lahu Kanade) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अरुण पाटील नाईक व माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयास घेराव घालून निवेदन देण्यात आले.

    यावेळी बोलताना कानडे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसानग्रस्त मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मंजूर झाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी केवायसी व आवश्यक ती पूर्तता केली आहे. तरीदेखील अद्याप तालुक्यातील बेलापूर,खानापूर, भामाठाण, नायगाव, पढेगाव, भेर्डापूर, मुठेवाडगाव गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपया देखील अनुदान प्राप्त झालेले नाही. तहसीलदार श्रीरामपूर व कृषी विभागीय अधिकारी श्रीरामपूर आणि संबंधित कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकरी वारंवार हेलपाटे मारत आहेत. मागील तीन महिन्यांपासून अनुदानाअभावी नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. यासाठी आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर आतापर्यंत चारवेळा आंदोलन करण्यात आले. मात्र दरवेळी प्रशासनाकडून लेखी आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. आता शेतकऱ्यांची सहनशीलता संपली आहे.

    यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. अरुण पाटील नाईक, विष्णुपंत खंडागळे, प्रविण काळे, अमोल आदिक, किसान सेलचे तालुका अध्यक्ष अजिंक्य उंडे, हरिभाऊ बनसोडे, बाळासाहेब दिघे यांनी चर्चेत सहभाग घेतला. अनुदानाची रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू असून ही रक्कम वाटपास लगेचच सुरुवात होईल, संपूर्ण शेतकऱ्यांना चार दिवसात नुकसान भरपाईची रक्कम अदा होईल, यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे आश्वासन तहसीलदार मिलिंद वाघ दिले.

    यावेळी सतीश बोर्डे, रमेश आव्हाड, आबा पवार, आशिष शिंदे, बाळासाहेब तनपुरे, दिपक कदम, कलीम कुरेशी, अस्लम सय्यद, चंद्रसेन लांडे, अनिल देशमुख, सुनील कवडे, योगेश आदिक, अनिल दांगट, संदीप दांगट, निलेश कवडे, पोपट गायकवाड, अरुण कवडे, सुरेश घोडके, करीम शाह, आप्पासाहेब आदिक, सुभाष दंगट, प्रकाश पानसरे, सतीश गवारे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here