BJP : काँग्रेस आमदारांचा माेठा गट भाजपात जाणार?; तीन राज्यातील निकालानंतर चर्चांना उधाण

    159

    BJP : नगर : नुकत्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. त्यामुळं तीन राज्यातील पराभवाचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसणार आहे. शिवसेना(Shiv Sena)राष्ट्रवादी (NCP) नंतर आता काँग्रेस (Congress) पक्ष देखील फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसमधील आमदारांचा गट भाजपत जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश निवडणुकांच्या निकालांचा फटका महाराष्ट्र काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता आहे. या निकालानंतर राज्यात लोकसभेसाठीच्या जागावाटपात काँग्रेसचा वाटा कमी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. विशेषत राष्ट्रवादी पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट काँग्रेसला जास्त जागा सोडण्याच्या तयारीत नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४४ जागांसाठी मविआची बोलणी पूर्ण झाली. यात ठाकरे गटाला १९ ते २१,  काँग्रेसला १३ ते १५ तर शरद पवार गटाला १० ते १५ जागा मिळू शकतात. ४ जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. मात्र, आता जागावाटपाची ही समीकरणं बदलू शकतात. फक्त जागावाटपातच काँग्रेसला हादरा बसणार नाही, तर तीन राज्यांच्या निकालांमुळे काँग्रेसमधील एक गट प्रचंड अस्वस्थ झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे हा गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

    ”ट्रीपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, सरकारमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. महागाई आणि बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. या सर्व नकारात्मक वातावरणात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधी पक्ष एकजुटीने लढतो आहे. अशावेळी संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहे. राज्यातील काँग्रेस संदर्भातील या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत. काँग्रेस एकजूट आहे. जनविरोधी सरकारच्या विरोधात आम्ही संघर्ष करत राहू.”, असे आमदार बाळासाहेब थाेरात यांनी ट्विट करीत माहिती दिली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here