
Bacchu Kadu : नगर : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) आक्रमक झाले असून, त्यांनी राज्य सरकारने (State Govt) शब्द पाळला नाही तर मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात उभं राहणार असल्याचा इशारा दिला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आतापर्यंत शिंदे समितीने काय-काय काम केलं त्याचा अहवाल द्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. मनोज जरांगे यांनी मुदत दिलेली 24 तारीख आता जवळ आली आहे. 17 तारखेला जरांगे नवीन आंदोलनाची घोषणा करणार आहेत असंही ते म्हणाले.
मराठा आंदोलकांवर अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्जच्या वेळी गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे सरकारने मागे घ्यावे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. यावेळी ते म्हणाले की मी जरांगे यांना शब्द दिला आहे, नाहीतर मी जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे.
आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळी मध्यस्ती करून जरांगे यांचे आंदोलन थांबवले होते. त्यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मराठ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्या मागणीला आमदार बच्चू कडूंनीही पाठिंबा दिला आहे.
ओबीसी नेत्यांचीही कानउघाडणी
ओबीसी नेते गेली 70-75 वर्षे सत्तेत होते, तेव्हा त्यांनी ओबीसी समाजासाठी काय केलं? असा सवाल बच्चू कडू यांनी केला. गेल्या 75 वर्षात जर शेतीचे प्रश्न मिटले असते, मजुराला योग्य मजुरी मिळाली असती तर आरक्षणाचा हा मुद्दा समोर आलाच नसता. त्यामुळे सर्व मतभेद, पक्ष विसरून ओबीसीसाठी एकत्र आलेल्या नेत्यांनी शेतकरी, शेतमजुरांसाठी एकत्र यावे, यासाठी आम्ही सुद्धा स्टेजवर येऊ असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला. राजकीय लोकांनी हे बरोबर हेरले आहे की जाती धर्माच्या नावाने लोक पेटतात, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपले कशात भले आहे हे ओळखले पाहिजे असे मत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केले.