मुंबई : अखेर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election Result 2022) जवळपास स्पष्ट झाले आहेत. पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपाने (BJP) बाजी मारली आहे. तर पु्न्हा एकदा काँग्रेसला (Congress) पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसला आपने धोबीपछाड दिला आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री चन्नी यांचा तर दोनही ठिकाणी पराभव झाला आहे. काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. उत्तराखंडमध्ये देखील हीच स्थिती आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते हरिश रावत यांचा पराभव झाला आहे. दरम्यान या सर्व घडामोडीवर राहूल गांधी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जनादेश नम्रपणे स्विकारतो, ज्यांना जनादेश मिळाला त्यांचे अभिनंदन, काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी कठोर परिश्रम घेतले, त्यांच्या समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे राहूल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
” जनतेचा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो. ज्यांना जनादेश मिळाला आहे अशा सर्व विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा. या निवडणुकीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्याबद्दल मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक करतो. त्यांच्या परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार व्यक्त करतो. आम्ही या निवडणुकीतून शिकू, जरी पराभव झाला असला तरी देखील लोकांच्या हितासाठी काम करत राहू” असं कँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचा पाचही राज्यात पराभव झाला आहे. विशेष: पंजाबमधील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागण्यासारखाच आहे. कारण पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून काही नवे प्रयोग करण्यात आले. मात्र हे नवे प्रयोग जनतेला फारसे न रुचल्याने काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळताना दिसत आहे. आपला निवडून दिल्याबद्दल केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानले आहेत.