मुंबई : विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबत आज मुंबई हायकोर्ट आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह 12 जणांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली होती. मात्र जवळपास 9 महिने झाले तरीही त्यााबाबतचा निर्णय न झाल्याने हा वाद कोर्टात पोहोचला आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, आज निकाल येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारनं पाठवेल्या प्रस्तावावर उत्तर देण्यास राज्यपाल बांधील नाहीत, असा दावा केंद्राने केला आहे. त्यावर अशा परिस्थितीत तोडगा काय असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. त्यानंतर आता आज या प्रकरणाचा निर्णय अपेक्षित आहे.
राज्यपाल जरी कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येत नसले तरी, त्यांचे निर्णय कायद्याच्या कक्षेत असणं आवश्यक, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. कोर्टापुढे आधीच 12 सदस्यांच्या नावाला विरोध करणाऱ्या याचिका प्रलंबित आहे. त्यात ही नवीन याचिका आल्याने कोर्ट त्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने 6 नोव्हेंबर 2020 रोजी 12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.
12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली आहे
एकनाथ खडसे
राजू शेट्टी
यशपाल भिंगे
आनंद शिंदे
रजनी पाटील
सचिन सावंत
सय्यद मुझफ्फर हुसैन
अनिरूद्ध वनकर
उर्मिला मातोंडकर
चंद्रकांत रघुवंशी
विजय करंजकर
नितीन पाटील