नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) आज मंगळवारी दुपारी एक अतिशय धक्कादायक घटना घडली. त्यामुळे शाळेला जाणारे विद्यार्थी आणि पालक यांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. त्याचे झाले असे की, एक स्कूल बस (School Bus) आग लागल्यामुळे जळून खाक झाली. मात्र, या घटनेत कुठलिही जीवीत हानी झाली नाही. त्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील पंचवटी परिसरात ही घटना घडली. या बसमध्ये विद्यार्थी आणि दोन शिक्षिका होत्या. मात्र, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
नाशिकमधील पंचवटी – म्हसरूळ भागात ही घटना घडली. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती मावळली आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. आज शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येत होते. तेव्हा अचानक एका स्कूल बसला आग लागली. त्यामुळे विद्यार्थी आणि आतील दोन शिक्षिका या घाबरून गेल्या. दरम्यान, गाडीला आग लागल्याचे समजताच चालकाने गाडी थांबवून विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. तसेच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. हे पथक येईपर्यंत स्कूल बस व्हॅन जळून खाक झाली. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. आता ही घटना नेमकी कशामुळे झाले याची चर्चा रंगली आहे. प्राथमिकदृष्ट्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
स्कूल बसला अपघात होण्याच्या आणि आग लागण्याच्या घटना वारंवार घडल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, यातून शाळा प्रशासन काहीच बोध घेताना दिसत नाहीत. या घटना टाळण्यासाठी खूप काही मोठे करण्याची गरज नाही. फक्त ज्या बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होते, त्यांचे चेकअप वेळच्या वेळी केले जावे. निर्धारित वेळेत या वाहनांची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्यात यावी. कारण एखाद्या वायरच्या स्पार्किंगमुळेही अख्ख्या गाडीला आग लागू शकते. आपण प्रयत्न केल्यास असे अपघात दक्षता बाळगली तर नक्कीच थांबवू शकतो. हे पाहता शाळा प्रशासनाने खबरदारी बाळगावी. अन्यथा एकदा मोठा अपघात घडू शकतो.