
नगर : जालना येथे मराठा आंदाेलकांवर लाठीचार्ज झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. मागच्या पाच वर्षांत मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण टीकवण्याचे काम कोणी केले असेल, तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, असा टाेला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी लगावला आहे.
मंत्री विखे पाटील म्हणाले, ”मला एक तरी उदाहरण दाखवावे, ज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार यांनी काही योगदान दिले आहे?. त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही.” गेल्या दाेन दिवसांपासून मराठा आंदाेलनाला बहुतांश ठिकाणी हिंसक वळण लागले. एसटी महामंडळाच्या अनेक गाड्यांचे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदाेलकांची नुकतीच भेट घेतली.
त्यावर पवार म्हणाले, ”जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची सरकारमधील संबंधित विभागाच्या प्रमुखांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा. जेव्हा मी मुख्यमंत्री असताना गोवारी आंदोलनात काही लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा माझ्या सरकारमधील आदिवासी मंत्री म्हणून मधुकर पिचड यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला होता. तसाच काहीसा निर्णय आत्ताच्या सरकारने घेणे गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी फडणवीसांचे नाव न घेता टोला लगावत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.