नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धाचा नकारात्मक परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आयएमएफने त्यांच्या अहवालात सांगितलं आहे. तुलनेने चीनच्या अर्थव्यवस्थेवर याचा कमी प्रभाव पडणार आहे असंही आएमएफने म्हटलं आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणामरशिया- युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होणार आहे. भारत हा कच्च्या तेलाच्या सर्वात मोठ्या आयातक देशांपैकी एक आहे. त्यामुळे या वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचं आएमएफने त्यांच्या अहवालात सांगितलं आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवर अधिक पैसा खर्च केल्यामुळे महागाई वाढ आणि चालू खात्यावरची तूट मोठ्या प्रमाणात वाढेल आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागेल असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.
भारतासोबतच अमेरिका, युरोपियन युनियन तसेच चीनच्याही अर्थव्यवस्थेला या संकटाचा सामना करावा लागणार आहे. पण इतर देशांच्या तुलनेत चीनला याचा कमी फटका बसणार आहे असं आयएमएफने म्हटलं आहे.
भारताचा विकासदर घटणारदरम्यान, भारताचा चालू विकास दर हा 9.5 टक्क्यांवरुन 9.1 टक्क्यांवर येईल असा अंदाज इंटरनॅशनल रेटिंग एजन्सी असलेल्या मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने व्यक्त केला आहे. देशातील वाढते इंधनाचे दर आणि वाढत्या महागाईचा परिणाम हा देशाच्या विकासावर होईल, त्यामुळेच विकासदराच ही घट होईल असं मूडीजने म्हटलं आहे.