मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, मुख्यमंत्री काय बोलणार?
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय. अशावेळी राज्यातील 25 जिल्हातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी आक्रमक मागणी आता होत आहे. भाजपसह अन्य विरोधी पक्ष आणि रेल्वे प्रवासी संघटनांकडून या मागणीसाठी आंदोलनही करण्यात येत आहे. तर व्यापारी वर्गही राज्य सरकारकडे शिथिलता देण्याची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री जनतेशी काय संवाद साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (CM Uddhav Thackeray will address the people at 8 pm tonight)