Rajesh Tope On Maharashtra Mask Free : महाराष्ट्रात कोरोनाचे (Maharashtra Corona Update) रुग्ण दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. अशात महाराष्ट्र मास्कमुक्त (corona mask) होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी कोल्हापुरात बोलताना म्हटलं आहे की, पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केलं आहे. हे का केलं आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या टास्क फोर्सला अशी विचारणा करण्याबाबत चर्चा झाली आहे, असं टोपे म्हणाले.
आता निर्बंध कमीच केले जातीलराजेश टोपे म्हणाले की, आता निर्बंध वाढवण्याचं काहीही कारण नाही. आता निर्बंध कमीच केले जातील. मुख्यमंत्री ठाकरे यांनी तसा विश्वास दिला आहे. महाराष्ट्र आजच मास्क मुक्त केला पाहिजे असं अजिबात नाही मात्र ज्यांनी मास्क मुक्त केलं त्यांचं शास्त्र काय याचा अभ्यास करत आहोत. तूर्त मास्क मुक्तीचा विषय नाही, असंही टोपे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या आरोपांबाबत बोलताना टोपे म्हणाले की, कोरोना काळात प्रत्येक राज्यांनी कार्यक्षमतेनं काम केलं आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी तर यासाठी तिजोरी रिकामी केली. कोरोना पेशंटला प्राधान्य दिलं. अनेक चांगल्या संस्थानी राज्याचं कौतुक केलं. आम्ही आमच्या परीने जमेल तेवढं काम केलं आहे, असं ते म्हणाले.
लसी वाया जात असल्याच्या संदर्भात टोपे यावेळी म्हणाले की, अनेक हॉस्पिटल्सनी पुढे येऊन लस खरेदी केली. आता लस एक्सपायरी होत असल्यानं त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे. मोठ्या कंपन्यांनी या लसी घ्याव्यात. त्यांची लस आधी घ्यावी आणि त्यांना दुसऱ्या द्याव्यात याबाबत सुद्धा केंद्राशी आणि राज्याशी बोलेन, असं टोपे म्हणाले.