नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील (Manoj jarange Patil) यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आलं असून उपचार सुरु करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. २९ ऑगस्टपासून ते उपोषण करत असल्याने त्यांना आता अशक्तपणाचा त्रास जाणवत आहे.
मनोज जरांगे-पाटील यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मध्यस्थी केली. परंतु आरक्षणाचा आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असे सांगून जरांगे यांनी त्यांना आणखी चार दिवसांची मुदत दिली असून उपोषण सुरूच राहील, असं मंगळवारी (ता. ५) ला स्पष्ट केलं आहे. जालन्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर राज्यभरातील विरोधी पक्षांनी आणि जनतेने सरकारला धारेवर धरलं आहे. त्यामुळे राज्य सरकार या आंदोलनाकडे लक्ष दिले आहे.
राज्य सरकारकडून आता मनोज जरांगे पाटलांची मनधरणी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने (ता. ५) मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी या गावात उपोषणाच्या ठिकाणी जाऊन भेट घेतली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. यावेळी महाजन यांच्याबरोबर मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार अर्जुन खोतकरही उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांनी जरांगे पाटलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी उपोषणावर ठाम असल्याचे सांगितलं आहे.