
नगर : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आता एका नव्या भूमिकेत त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर त्यांनी शेअर करत चाहत्यांना खास भेट दिली आहे. मात्र देशात इंडिया की भारत (India VS Bharat) असा वाद पेटलेला असताना याचा परिणाम चित्रपटाच्या टॅगलाईनवर देखील झालेला पाहायला मिळाला आहे. अक्षय कुमारने त्याच्या सिनेमाची टॅगलाईन बदलली आहे.
अक्षयच्या आगामी सिनेमाचं नाव आधी ‘मिशन रानीगंज : द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ (Mission Raniganj The Great Indian Rescue) असं ठेवलं होतं. पण आता अभिनेत्याने सिनेमाच्या नावात बदल केला आहे. या सिनेमाचं नाव आता ‘मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू’ (Mission Raniganj The Great Bharat Rescue) असं ठेवण्यात आलं आहे.
‘मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू’ हा सिनेमा १९८९ मध्ये कोळसा क्षेत्रात घडलेल्या एका वास्तविक घटनेवर आधारित आहे. या सिनेमात खिलाडी कुमार दिवंगत जसवंत सिंह गिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पुरात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यात जसवंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तीच कथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. या सिनेमाचा टीझर अक्षय कुमारने त्याच्या शेअर करत लिहिलं आहे,” १९८९मध्ये एका व्यक्तीनेअशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली. या नाटकाची गोष्ट जाणून घेण्यासाठी ६ ऑक्टोबरला सिनेमागृहात नक्की या”.
या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा टीनू सुरेश देसाई यांनी सांभाळली आहे. अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, पवन मल्होत्रा, कुमुद मिश्रा, रवी किशन आणि शिशिर शर्मा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.