
संगमनेर: खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी काढलेल्या भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त संगमनेरात विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसने पदयात्रेचे आयोजन केले होते.
या पदयात्रेत युवक, महिला, नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध ठिकाणी झालेल्या उत्स्फूर्त स्वागतासह भारत जोडो यात्रा ही देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी ठरली आहे. सर्व रेकॉर्ड मोडणाऱ्या या यात्रेचा आपल्या सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोदगार या यात्रेचे समन्वयक तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त संगमनेर नगरपालिका ते नवीन नगर रोड अशी पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी झालेल्या सभेत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नाशिकचे राजाराम पानगव्हाणे, महिला काँग्रेसच्या सचिव उत्कर्षाताई रुपवते, ॲड. माधवराव कानवडे आदींसह संगमनेर तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक ,महिला ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





