नवी दिल्ली : कार आणि इतर वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी भारतात बरेच प्रयत्न केले जात आहेत आणि त्यातील एक प्रयत्न म्हणजे हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या कार बाजारात आणणे. ग्रीन हायड्रोजन इंधनावर (Green Hydrogen Fuel) चालणाऱ्या अशाच एका कारच्या मदतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) संसदेत पोहोचले. टोयोटा मिराई (2022 Toyota Mirai) असे या कारचे नाव आहे. टोयोटाने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही कार तयार केली असून त्यात अत्याधुनिक इंधन सेल यंत्रणा (अॅडव्हान्स फ्यूल सिस्टिम) बसवली आहे. ही सिस्टम सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे मिश्रण करून एका विशेष प्रक्रियेद्वारे वीज निर्माण करते. या विजेच्या साहाय्याने गाडी धावते.
या कारच्या मदतीने नितीन गडकरी बुधवारी संसदेत पोहोचले. या कारमधून उत्सर्जनाच्या स्वरूपात केवळ पाणी बाहेर येतं.
या कारबाबत बोलताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ही कार पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. तसेच या कारमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. ते पुढे म्हणाले की ही कार भारताचं भविष्य आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु हायड्रोफ्यूल कारमुळे प्रदूषण होत नाही.
टोयोटाने नुकतीच आपली हायड्रोजन कार टोयोटा मिराई भारतीय ऑटोमोबाईल बाजारात लॉन्च केली आहे. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतच ही कार सादर करण्यात आली. गडकरींनी ही कार आपलं भविष्य आहेस, असं वर्णन केलं असून जपानी भाषेत मिराई या शब्दाचा अर्थ भविष्य असा होतो.
हायड्रोजन फ्यूल कारच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे तर, यामध्ये इंधन भरणं सोपं आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे हे फ्यूल देखील 2-3 मिनिटात भरले जाऊ शकते. हायड्रोजन पॉवर कारमधील प्रेशर टँकमध्ये हायड्रोजन साठवता येतं. त्यानंतर ते वीज निर्मितीसाठी फ्यूल सेलमध्ये हस्तांतरित केले जाते.