औरंगाबादः जिल्ह्यातील पैठण आगारात एसटी संपात (ST Strike) फूट पडल्यानं काल एक एसटी बस आगारातून बाहेर पडली. या बसच्या पुढे आणि मागे पोलिसांच्या गाडीचे संरक्षण देण्यात आले होते. मात्र अज्ञात व्यक्तींची अखेर या बसची तोडफोड केल्याने ही बस माघारी फिरली. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 10 दिवस आगारातून (Paithan ST Bus Depot) एकही बस सुटली नव्हती.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागील 10 दिवसांपासून शासनामध्ये विलीनीकरण्याच्या मागणीवरून संप पुकारला आहे. या विलीनीकरणाच्या मागणीवरून राज्यभरातील प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली. संपावर तोडगा निघत नसल्यानं एसटी प्रशासनानं कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी कर्मचारी कामावर परतत असल्याचं चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आगारातही एक चालक आणि एक वाहक कामावर रुजू झाल्यानंतर एसटी बस काल आगारातून बाहेर पडली. मात्र या बसला पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. अखेर रहाटगाव फाट्यावर काही अज्ञातांनी या बसवर दगडफेक केली. त्याममुळे ही बस पुन्हा एकदा पैठणच्या आगारात आणण्यात आली.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. सरकार कोणत्याही कर्मचाऱ्याचं नुकसान करू इच्छित नाही. लोकांना पर्यायी व्यवस्था देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन परब यांनी केलं आहे.
सांगलीतही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. जनतेला एसटीची सोय व्हावी म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. तर काही भाजपचे नेते या एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबर संप करत आहेत. प्रवाशांना वेठीस धरून चालणार नाही. म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शिवसेनेने एसटी बसच्या मागे पुढे आपल्या गाड्या लावून एसटीला संरक्षण दिले. मात्र काल इस्लामपूर-ताकारी रयत क्रांती संघटनेच्या एका कार्यकर्त्याकडून बसवर दगडफेक करण्यात आली.