
पारनेर : जालना येथे मराठा आंदोलकांवर (jalna Marata Strike) झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली असताना पारनेर तहसील कार्यालय (Parner Tehsil Office) ओस पडले होते. तहसीलदार,नायब तहसीलदार कार्यालयात अनुपस्थित होते. जालना येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात गेले असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे निवेदन स्वीकारण्यास जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी अखेर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निवेदन चिकटवले आहे.
यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे,पत्रकार मार्तंड बुचुडे, वकील गणेश कावरे, सेनापती बापट पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रवींद्र पुजारी, तुषार औटी,नंदकुमार दरेकर, कांतीलाल कोकाटे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सतिष म्हस्के,रायभान औटी, तुषार ज्ञानेश्वर औटी,संदीप कावरे आदी उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चिकटवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी जालना येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. या लाठीमाराचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थन करीत आहेत, ही खेदाची बाब आहे. फडणवीस यांनी लाठीमाराची नैतीक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.




