
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांना दिली आहे. छगन भुजबळांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका केली होती. मात्र आता भुजबळांची ही नाराजी दूर होण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले. आता हेच खाते पुन्हा एकदा धनंजय मुंडेंकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भुजबळांनी मानले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार
छगन भुजबळ यांनी शपथविधीआधी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही मी ऋण व्यक्त करतो. येवला-लासलगाव मतदारसंघातील जनतेचे, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे, तसेच समता परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी विशेषतः आभार मानतो. आजवर माझ्यावर प्रेम आणि विश्वास दाखवणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मंत्रीपदाबाबतचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला होता. एका बैठकीतच हे निश्चित करण्यात आले होते. सोमवारऐवजी मंगळवारीच शपथविधी होईल असे तेव्हाचठरवण्यात आले होते. कारण मंगळवारी (दि.२०)मंत्रीमंडळातील नेते व इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थितराहू शकतात. त्यामुळेच हा दिवस निवडण्यात आला आहे.ऑल इज वेल वेअर एन्ड इज वेल ज्याचा शेवट चांगलात्याचं सर्व चांगलं असे त्यांनी म्हटले आहे.