
अकोले: (Akole) तालुक्याच्या दक्षिण पठार भागाला वरदान असलेले बेलापूर बदगी लघू पाटबंधारे प्रकल्प (Minor Irrigation Projects) (९४.५८ दशलक्ष घनफूट) व कोटमारा धरण (Dam) (१५५ दशलक्ष घनफूट) दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. एखादा अपवाद वगळता गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी (Farmers) वर्ग चिंतातूर झाला आहे.
जून, जुलै महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मात्र संगमनेर – अकोले तालुक्याच्या दक्षिणेस पठार भागात मात्र मोठ्या पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाचे तीन महिने संपले. सप्टेंबर सुरू झाला तरी समाधानकारक मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे बेलापूर बदगी व कोटमारा धरणांत अतिशय कमी पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुटवाडी येथील कोटमारा धरणावर कुरकुटवाडीसह आंबीदुमाला, बोटा आदी गावांचे भवितव्य अवलंबून असते. बेलापूर बदगी लघू पाटबंधारे प्रकल्पावर बेलापूरसह, चैतन्यपूर, बदगी, जांभळे, ब्राह्मणवाडा या गावांचे भवितव्य अवलंबून असते. वरील दोन्ही धरणे कच नदीवर आहेत. कच नदीचे उगमस्थान असलेल्या ब्राह्मणवाडा परिसरात मोठा पाऊस झालेला नाही. दरवर्षी ही धरणे पावसाळ्यात ओसंडून वाहत असतात. यंदा मात्र ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तरी अद्याप धरणे भरलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून ते हवालदिल झाले आहेत.




