देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर, हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार

531

अमरावती : भाजपचे (BJP) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर आहेत. अमरावतीत झालेल्या हिंसाचारात (Amravati Violence) जखमी झालेल्यांची फडणवीस भेट घेणार आहेत. तसेच, ते व्यापारी आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे.

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत जाऊन हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते हिंसाचारात दुकानांची तोडफोड झालेल्या परिसरातही जाणार आहेत. तसेच, व्यापाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर ते अमरावती पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी साडे 12 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत.

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यात अनेक वाहनं आणि दुकानांचंही नुकसान झालं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अखेर सहा दिवसानंतर शहरात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलीये. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम करणारे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, शहरातील संचारबंदी मात्र अद्यापही कायम ठेवण्यात आली आहे.

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. या हिंसक कारवायांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरावतीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले. यातदेखील भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. त्यामुळे शनिनारी 1 वाजेपासून अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच, शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

त्रिपुरा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्याचे पडसाद अकोल्यातही दिसून आले होते. त्यामुळे गेल्या 13 नोव्हेंबरपासून अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता 21 नोव्हेंबरपर्यंत या संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे.

यामध्ये सर्व नियम कायम आहेत. पण यापुढे धरणे, आंदोलन किंवा मोर्चे असतील या सर्वांना निर्बंध असणार आहेत. मात्र. आता सायंकाळी सात वाजेनंतर कोणीही बाहेर दिसल्यास किंवा संचारबंदीचे नियम मोडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here