तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटना देशासाठी चिंताजनक, शरद पवारांकडून संवेदना प्रकट

692

मुंबई : तामिळनाडूमध्ये संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात (Helicopter Accident) एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. तर सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) हे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळलेले शरद पवार (Sharad Pawar) यांनी दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केलीय. ही दुर्घटना अतिशय चिंताजनक आणि दु:खदायक आहे. मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसमेवत माझ्या संवेदना आहेत, असं शरद पवार म्हणाले. तसंच पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा एक थरारक अनुभवही सांगितला.

शरद पवार म्हणाले की, ‘देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख किंवा संरक्षणमंत्री असोत. ते ज्या वाहनातून प्रवास करतात. त्यांची वाहणं अतिशय उत्तम दर्जाची असतात. कुठल्याची संकटाचा सामना करण्यास त्यांचं हेलिकॉप्टर सज्ज असतं. हे हेलिकॉप्टर अतिशय उत्तम दर्जाचं आणि सुरक्षित आहे. त्यामुळे अशाप्रकारचा अपघात या हेलिकॉप्टरचा होणं ही अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक आहे’.

‘माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो. त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे ज्यायला मर्यादा आल्या. ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं. आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं. पण मला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळेमहाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वात उंच शिखर नाही. ते 5 हजार फुटाच्या वर नाही. तेव्हा मी तातडीने पायलटला सांगितलं की आपण ७ हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. ते हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करुन सुखरुपपणे आम्ही उतरू शकलो’, असा अनुभवही पवार यांनी यावेळी सांगितला.

‘तामिळनाडूत जो काही प्रकार झाला त्याची खोलवर माहिती माझ्याकडे नाही. माझ्या माहितीप्रमाणे हेलिकॉप्टरचा अपघात झाला तो संपूर्ण परिसर जंगल आणि डोंगराचा आहे. त्यामुळे या ठिकाणी व्हिजिबिलीटीचा प्रश्न आला का? याची मला काही कल्पना नाही. पण या अपघातामुळं देशाचं मोठं नुकसान झालं आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. त्यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्ट होती आणि गेल्या चार दशकांतील त्यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा नेहमीच स्मरणात राहील. ही घटना देशाच्या दृष्टीने अतिशय दु:खदायक, चिंताजनक आणि काळजी करणारी आहे. अपघातातील मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत’, अशा शब्दात पवार यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here