जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली

548

अमरावती : त्रिपुरा राज्यात मशीद जाळल्याच्या कथित घटनेनंतर अमरावतीमध्ये वातावरण चिघळलं आहे. 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मुस्लीम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर येथे दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर अमरावतीला शांत करण्यासाठी बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, वाशीम जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. तसेच येथे संचारबंदी जारी करण्यात आलीय.

चार जिल्ह्यांतून पोलिसांची कुमक मागवली, जिल्ह्यात इंटरनेट बंदी

त्रिपुरा येथे मिशिदीवर हल्ला झाल्याचे कथित वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. या वृत्तामुळे मुस्लीम समाजाने आयोजित केलेल्या मोर्चाला गालबोट लागले. त्यानंतर आता वातावरण चिघळले आहे. सलग दुसऱ्या दिवशी अमरावती शहर धुमसत आहे. सध्या परिस्थिती तणावाची आहे. मात्र भविष्यकालीन विचार करुन येथे पोलीस संरक्षण वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशीम या जिल्ह्यांतून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आलीय. हिंसक जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच संपूर्ण जिल्ह्यात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आलीय. विशेष म्हणजे सध्या येथे इंटरनेटची सुविधादेखील बंद करण्यात आलीय.

नेमंक काय घडलं ?

त्रिपुरा येथे एका मिशिदीला जाळण्यात आल्याचे कथित वृत्त संपूर्ण राज्यभर वाऱ्यासारखे पसरले. या वृत्तानंतर नांदेड, मालेगाव अशा शहरात मुस्लीम बांधवांचे मोठे मोर्चे निघाले. अमरावतीतदेखील मोठा मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला समोर हिंसक वळण लागले. 12 नोव्हेंबर रोजी काही आंदोलकांनी बळाचा वापर करुन दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही ठिकाणी दगडफेकीच्यादेखील घटना घडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

सलग दुसऱ्या दिवशी तणावाचे वातवरण

आजदेखील (13 नोव्हेंबर) अमरावती शहर धुमसतच आहे. येथे आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळापासून जमावाकडून दगडफेक सुरु आहे. काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला. मात्र, जमाव प्रचंड असल्याने त्यांना नियंत्रित करणं अशक्य होत होतं. शिवाय पोलिसांची कुमकही कमी असल्याने जमावाला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here