कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे जनतेशी साधलेल्या थेट संवादात ही घोषणा केली.
स्मार्टफोन बाळगणारे प्रवासी ॲपवरून रेल्वे पास डाऊनलोड करू शकतील आणि स्मार्टफोन नसणारे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांमधून फोटो पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासेसवर क्यूआर कोड असतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विषाणू आपला अवतार झपाट्याने बदलत आहे. त्याचे परिणाम लक्षात घेऊन वेळेत उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरु केली आहे. याचा राज्यालाही उपयोग होईल. राज्याची ऑक्सिजन निर्मिती आजही दर दिवशी १३०० मे.टन इतकीच आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
इतर राज्य व देशांत आता पुन्हा रुग्णवाढ दिसू लागली आहे. त्याचा अंदाज घेऊन राज्यात पुन्हा रुग्णवाढ झाल्यास नाईलाजाने निर्बंध कडक करावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये. नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन
केंद्राने १०२ व्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. परंतु, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत या प्रस्तावाचा उपयोग नसल्याने ही मर्यादा उठवावी व राज्याला आरक्षणाचे अधिकार द्यावेत. याबाबत पंतप्रधानांकडे मागणी केली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.






