देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला होता. मात्र, आता आयपीएलने स्पर्धा रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, चेन्नईच्याही तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलने स्पर्धा रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे. बायो-बबलमध्येही कोरोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करत होतं. मात्र यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हैदराबाद आणि मुंबईमध्ये आज दिल्लीत सामना होणार होता. खेळाडूंनाही करोनाची लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.आयपीएलचे आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.