नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश निवडणूक, (UP Election) महाराष्ट्र सरकार, विधिमंडळाचं अधिवेशन, ओमिक्रॉन (Omicron) यावर भाष्य केलं. लखीमपूर खेरी प्रकरणी आम्ही काल मार्च काढला होता. राहुल गांधी यांनी त्यावेळी सांगितलं की काही झालं तरी आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी आंदोलनाचा इतिहास पाहता हे अशक्य नाही. राहुल गांधीचा हा आत्मविश्वास पाहता उत्तर प्रदेशात सत्ताबदल होतोय, त्यापाठोपाठ केंद्रातही सत्ता बदल होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. उत्तर प्रदेशात राजकीय परिवर्तन होईल, असं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), देशाचे गृहमंत्री तिथं आठ आठ दिवस मुक्काम टाकून का बसलेले आहेत,असा सवाल संजय राऊत यांनी केला. पश्चिम बंगालमध्येही त्यांनी असाच डेरा टाकला होता. पण त्यांचा पराभव झाला होता, असं संजय राऊत म्हणाले.
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातून एक नवी सुरुवात झालीय, असंही संजय राऊत म्हणाले. देशातील पाच राज्यातील परिवर्तनाची दिशा काय आहे हे तुम्हाला दिसून येईल, असं संजय राऊत म्हणाले.
तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे काम करतंय हे चंद्रकांत पाटलांना माहिती आहे. विरोधी पक्षाचं काम करा, असं संजय राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा नियम बदलल्यावरुन टीका होत असेल तर आम्ही तो धडा केंद्र सरकारकडून घेतला आहे. मोदी सरकारच्या पावलावर आम्ही काही गोष्टींसाठी पाऊल टाकत आहोत.
केंद्र सरकारनं ओमिक्रॉनसंदर्भात सूचना दिल्या आहेत. केंद्रांच्या सूचनाप्रमाणं अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात आला आहे. विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
भाजपच्या कार्यालयातून ईडीची सूत्र हालत असतील तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्रास होणार हे गृहीत धरलं आहे. जया बच्चन यांची सूनबाई आणि लेकासंदर्भात वाचलं आहे. जे सरकारला प्रश्न विचारतील त्यांना त्रास दिला जाईल हे 2024 पर्यंत सुरु राहील. मात्र, 2024 पासून उलटी गंगा वाहयला सुरुवात होईल, असं संजय राऊत म्हणाले.







