कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला

672


जळगाव, (जिमाका) दि. 26 – जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक भागात अजून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने पिकाला पाण्याचा ताण पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ज्याठिकाणी पाण्याची सोय आहे तेथे पिकाला संरक्षित पाणी द्यावे. पाण्याची कमी उपलब्धता असेल तर सरी आड सरी पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची व्यवस्था असेल तर जमिनीच्या मगदुरानुसार दीड ते दोन तास ठिबक सिंचन संच चालवून पाणी द्यावे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
पिकाला पाण्याचा मोठा ताण पडू देऊ नये कायम वाफसा परिस्थिीती ठेवावी. मोठा ताण पडल्यानंतर पाऊस आल्यास किंवा पाणी दिल्यास झाडे उभळन्याची (आकस्मिक मर रोग) शक्यता असते. ज्या ठिकाणी कोणतीही पाणी देण्याची व्यवस्था नाही अशा ठिकाणी पिकाला हलक्या कोळपन्या करणे सुरु ठेवावे. तसेच 13:00:45 या विद्राव्य खतांची (1 टक्के) 100 लिटर पाण्यात 1 किलो याप्रमाणात फवारणी करावी. 15 दिवसांनी परत दुसरी फवारणी करावी.
रस शोषणाऱ्या किडींचे सर्वेक्षण करुन किड आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्यास आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. एका वेळेस एकच किटकनाशक वापरावे. 5 टक्के निंबोळी अर्क / quinolphos २०%, गुलाबी बोंडअळी साठी फेरोमन सापळा लावून घ्यावेत व नियमित सर्वेक्षण करावे. डोमकळया दिसल्यास तोडून नष्ट कराव्यात. कीड आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास कीड संरक्षणात्मक उपाय योजना करावी.
पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीत ओल असल्यास नत्रयुक्त खतांचा दुसरा हप्ता दिला गेला नसेल तर एकरी एक गोणी युरिया खताची मात्रा द्यावी. दोन कापूस सरीनंतर एक मृत सरी काढावी. पाऊस लांबल्यावर यामध्ये साठलेल्या पाण्याचा पिकास फायदा होतो. फुले, पाते व लहान बोंडे यांची नैसर्गिक गळ कमी करण्यासाठी 5 मीली नॅपथॅलीक ॲसीटीक ॲसीड (प्लॉनोफिक्स) 15 लीटर पाण्यात फवारणी करावी. 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
फुलांवर जर पांढरी बुरशी वाढलेली असेल तर 15 ली. पाण्यात 15 ग्रॅम बावीस्टीन (कार्बेन्डेझिम) या बुरशीनाशकाची फवारणी करावी. असेही श्री. ठाकूर यांनीप्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here