नाशिक : “राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये” कारण त्यांना अधिकार नाही. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा राज्य सरकारचा संबंध नाही. निर्यातबंदी, आयात या संदर्भातील निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतात,” असे शरद पवार हे कांदा प्रश्नावर बैठकीदरम्यान म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी (ता. २८) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच मुंबईला परतण्यापूर्वी कांदाप्रश्नी शेतकरी, व्यापारी प्रतिनिधींनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांद्याच्या झालेल्या वांध्याच्या व्यथा मांडल्या.
शरद पवारांचे कांदाप्रश्नी व्यापाऱ्यांना आवाहन
कांदा व्यापारांनी बाजार बंद करणं अयोग्य आहे. व्यापाऱ्यांनी चर्चेतून समस्या सोडवावी लागेल. बाजारातील चढ-उताराची झळ कांद्याला बसली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नाशिकचा कांदा असतो असं यावेळी त्यांनी नमूद केलं. सर्वाधिक कांद्याचे पीक हे नाशिकमध्येच आहे. तसेच निर्यातीबाबत देश पातळीवर निर्णय असून केद्र सरकारशी याबाबत चर्चा करावी लागेल असे पवार म्हणाले. कांदा प्रश्नाबाबत राज्य सरकारकडून अपेक्षा करू नये असेही शरद पवार म्हणाले. यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी शरद पवार यांनी कांदाप्रश्नी व्यापाऱ्यांना आवाहन केले.
कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज
कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसंच कांद्याच्या दरात कायम चढ उतार होणं ही चिंतेची बाब असून कांदा आयात निर्यातीचे सर्व अधिकार केंद्राकडे असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवार नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नावर महत्तपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.